👉आम आदमी पक्षाची आक्रमक भूमिका…
✍️ प्रितम पाटील (बल्लारपूर प्रतिनिधी)
बल्लारपूर,०२ जुलै २०२५ : शहरात सद्याची स्थिती बघता अस्वच्छतेने कळस गाठला असून, शहरातील टेकडी, डेपो आणि वस्ती या तिन्ही विभागातील नाल्या तुंबलेल्या आहेत,रस्त्या रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे साचले असून नियमित साफसफाईचा पूर्णपणे अभाव दिसत आहे. याबाबत आम आदमी पार्टी, बल्लारपूर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत सफाई विभाग अधिकारी यांना चेतावणी दिली आहे. पावसाळा सुरू होऊनही नाल्यांची साफसफाई झालेली नाही, ज्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यांवर येत आहे. रस्त्यांची आणि गल्ल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. साप्ताहिक बाजार परिसरात नागरिकांना आणि विक्रेत्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे. अनेक ठिकाणी झुडपे वाढली असून, त्यांचीही साफसफाई झालेली नाही.
या गंभीर परिस्थितीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय, नगर पालिकातर्फे साफसफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा उपकरणे पुरवली जात नसल्याची बाब समोर येत असून ती चिंताजनक आहे. बल्लारपूर शहराची मोठी लोकसंख्या असूनही, तिन्ही विभागांसाठी पूर्णवेळ स्वच्छता निरीक्षक नाहीत आणि सफाई कर्मचाऱ्यांची संख्या देखील अपुरी असून ठेकेदार किती कामगार कामावर पाठवतो याची नियमित तपासणी होतांना दिसून येत नाही. विभाग सफाई कामगार कार्यालयात सिसीटिव्ही सह बायोमेट्रिक हजेरी का लावली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्व बाबींवर तातडीने लक्ष देऊन, बल्लारपूर शहरातील सर्व रस्ते, गल्ल्या आणि नाल्यांची युद्धपातळीवर साफसफाई करावी, डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंगची व्यवस्था करावी, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि तिन्ही विभागात पूर्णवेळ स्वच्छता निरीक्षक उपलब्ध करून द्यावे, अशी तातडीची मागणी केली आहे.”बल्लारपूर शहर स्वच्छ राहिल्यासच, नागरिक निरोगी राहू शकतील” या गंभीर समस्येवर त्वरित उपाययोजना न झाल्यास, भविष्यात आम्हाला पुन्हा निवेदन देण्याची गरज भासली तर आम्हाला तीव्र भूमिका घ्यावी लागेल असे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार म्हणाले.


