सोयी-सुविधा व उपाययोजनांची विधानसभेत मागणी
प्रवीन बागडे//प्रतिनिधी
मुंबई/नागपूर दि.१८ जूलै २०२५
दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनी लाखो अनुयायी येतात. त्यांची कुठलीच गैरसोय होणार नाही याकरिता दक्षता घेऊन स्थानिक प्रशासनाने आयटीआय समोरील मोकळ्या जागेत धम्मचक्र प्रवर्तन दिना पूर्वी शौचालयाचे बांधकाम करून सोयी-सुविधा व उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेचे जेष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत केली.
यावेळी बोलतांना डॉ. राऊत म्हणालेत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमीत्याने दिक्षाभूमी येथे येणारे लाखो आंबेडकरी अनुयायी दिक्षाभूमीच्या परिसरात दोन ते तीन दिवस मुक्कामी असतात. दीक्षाभूमी परिसरात अनेक वर्षापासून आयटीआय समोरील मोकळ्या जागेत अस्थायी आणि तात्पुरत्या स्वरुपात शौचालयाची सोय करण्यात येते. परंतू, त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता पक्की संरक्षण भिंत उभी करण्यात आली आहे. त्यामुळे जुने शौचालय वापरण्यायोग्य राहिलेले नाही आणि नवीन व्यवस्था अद्याप करण्यात आलेली नाही. ज्यामुळे ०२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी दिक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊन गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्थानिक प्रशासनाला दिक्षाभूमीच्या महत्त्वाची जाणीव असूनही स्थानिक प्रशासनाने ही बाब दुर्लक्षित केल्याचा आरोप करित डॉ. राऊत म्हणालेत सामाजिक समतेचा आणि मानवमूल्यांचा संदेश देणाऱ्या दीक्षाभूमीवर मूलभूत सुविधांची गैरसोय ही दुर्दैवी बाब आहे. प्रशासनाने तत्काळ पावले उचलून अनुयायांची गैरसोय टाळण्याकरिता पाहणी करून सोयी-सुविधा व उपाययोजनांची मागणी डॉ. राऊत यांनी अधिवेशन दरम्यान सभागृहात केली.
महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल
धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमी येथे लाखो भाविकांची गर्दी होणार असून स्वच्छतेच्या अभावामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.परिसरात खुले शौच टाळण्यासाठी शौचालये आवश्यक आहेत. त्याचा अभाव झाल्यास परिसरात अस्वच्छता पसरून रोगराईचा धोका निर्माण होईल, याची रोकथाम करिता विशेष खबरदारी घेण्याची मागणी आमदार डॉ. नितीन राऊत यांनी सभागृहात केली.


